‘मला आणि काशिनाथला जे प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं, त्याची सुरुवात पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामधूनच झाली!....’ सांगताहेत मराठी नाटक-सिनेमातला एक काळ गाजवलेले, उत्कृष्ट अभिनयासाठी वाखाणले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि पुण्यातले बुजुर्ग कलाकार श्रीकांत मोघे...
....................
पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर आणि मुंबईचं बिर्ला नाट्यगृह म्हणजे जणू स्टेटस सिम्बॉल असल्यासारखे होते. नाट्यप्रेमी जसा लंडनला गेल्यावर तिथल्या उत्तमोत्तम थिएटरची चौकशी करतो, तसंच त्या काळी भारताबाहेरून कुठल्याही देशातून इथे येणारा मराठी नाट्यवेडा प्रेक्षक मुंबईत ‘बिर्ला’ला काय आहे आणि पुण्यात ‘बालगंधर्व’ला कोणत्या नाटकाचा प्रयोग आहे, याची चौकशी करत असत. पुण्यात ‘बालगंधर्व’ला येणारा प्रेक्षक हा या थिएटरशी एकनिष्ठ असायचा. ‘नाटक पाहीन तर ‘गंधर्व’लाच’ असं ठासून सांगणारे प्रेक्षक होते. काय माहौल असायचा तो! अत्तराचा सुवास, स्त्रियांनी केसांत माळलेल्या गजऱ्यांचा घमघमाट.... अगदी नवे कपडे घालून एखाद्या समारंभाला, मंगलकार्याला आल्यासारखी मंडळी यायची. गंधर्व हे ‘टॉप क्लास’ नाट्यगृह होतं. यू नेम दी सेलेब्रिटी अँड ही वॉज देअर!! शंतनुराव किर्लोस्कर, शेठ वालचंद यांसारखे उद्योगपती येत असत. मी ‘आंधळ्यांची शाळा,’ ‘अ-पूर्व बंगाल’ आणि ‘तुझे आहे तुझपाशी’ यांसारख्या नाटकांतून मी सुरुवात केली होती. मी दिल्लीला रेडिओवर होतो. मग ‘पीएल’नं (पु. ल. देशपांडे) ‘वाऱ्यावरची वरात’साठी घेतलं. ते नाटक असं काही उसळलं, की विचारू नका. मला आठवतंय, आचार्य अत्रे ‘वाऱ्यावरची वरात’ला आले होते, ते अक्षरशः कोलमडून हसले!
‘गंधर्व’मध्ये सगळ्याच नाटकांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत राहिला. त्या वेळी आम्हा कलाकारांनाही प्रत्येकी चारच तिकिटं मिळत. प्रेक्षक सकाळी उठून येऊन अॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगेत उभे राहत असत. आमच्या घरच्यांसाठी आम्हालाही सगळ्यांसमोर प्लॅन ओपन झाल्यावरच चार तिकिटं बुक करून ठेवावी लागत. स्वतः ‘पीएल’लाही चारच तिकिटं मिळत. ‘पीएल’चं खरंच कौतुक, की इतकं सुंदर थिएटर उभं केलं, स्वच्छतेला प्राधान्य देऊन. खरं तर आम्हाला मानधन अगदीच किरकोळ असे; पण समाधान कमालीचं होतं. मला आणि काशिनाथला (घाणेकर) जे प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं, त्याची सुरुवात ‘गंधर्व’मधूनच झाली! तो खऱ्या अर्थानं नाटकांचा वैभवाचा काळ होता. ज्ञानेश्वर माऊलींची जशी ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असं म्हणतात, तसं मी म्हणेन, की ‘प्रत्येकानं आयुष्यात एक तरी भूमिका अनुभवावी!!
( शब्दांकन : प्रसन्न पेठे)
(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने उलगडला आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध आहेत.)